चार जण अटकेत एक फरार ; चौघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी
लातूर : शेतमाल खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करणाऱ्या ऑक्टगन फूड्सच्या भागीदारांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून आर्या टेक, डीएफ फायनान्स, जय किसान फायनान्स यांच्याकडून तब्बल ५५ कोटी कर्ज उचलले, यापैकी १६ कोटी ८० लाख थकीत राहिले आणि फायनान्स केलेल्या कंपनीनी नोटीस पाठवली, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ऑक्टगन चे संचालक राहूल कलंत्री याच्यासह इतर चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी चौघे अटक तर बद्री विशाल मुंदडा हा फरार आहे. चौघांना न्यायालया समोर उभे केले असता १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूरच्या अतिरिक्त एमआयडीसी भागातील ऑक्टगन फूड उद्योगात असलेल्या सात भागीदारापैकी एक भागीदार राहूल कलंत्री याने इतर भागीदारांना अंधारात ठेऊन चार कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बनावट अग्रीमेंट, ठराव, लेटरहेड, शिक्के, ई-मेल बनवून या पाच जणांनी तब्बल ५५ कोटी कर्ज घेतले, कर्ज ऑक्टगनच्या नावाने घेतले पण परतफेड मात्र वैयक्तिक नावाने केली, ५५ पैकी १७ कोटी थकीत राहिले आणि फायनान्स कंपनीने नोटीस पाठवली. त्यानंतर १६ कोटी ७९ लाख ७ हजार ६६६ रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. यावरून राहुल पन्नालाल कलंत्री, अतुल पांचाळ, सुधीर भुतडा, बद्रीविशाल मुंदडा, रमेश चोपडे सर्व रा. लातूर यांच्या विरोधात किशोर शिवराज वर्मा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत विश्वासघात, फसवणूक, आर्थिक घोटाळा, बनावट कागदपत्रं बनविणे, कट करणे आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप डोलारे हे तपास करीत आहेत.