तुमच्या मुलाला बालदमा तर नाही ना? घशातुन आवाज येतोय का ?

6 Min Read

| मुखपत्र दक्षता वृत्तांत 

लातूर : दमा हा एक दीर्घकालीन (क्रॉनिक) असा आजार आहे. यामध्ये आपल्या श्वसनमार्गावर परिणाम होत असतो. जो आपल्या वायुमार्गावर परिणाम करतो. दम्यामध्ये श्वसनमार्ग अरुंद आणि सुजयुक्त बनतो. त्यातून अधिक प्रमाणात कफाची (Mucus) निर्मिती होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन दम लागत असतो. दमा हा आजार सर्वच वयाच्या लोकांना होऊ शकतो. लहान मुलांमध्ये दमा असल्यास त्याला ‘बालदमा’ असे म्हणतात. बालदम्याचा त्रास अनेक लहान मुलांमध्ये असतो. दम्याने त्रस्त असणाऱ्या मुलांना दम्यामुळे छातीत घरघर होणे, खोकला, छातीत कफ साठणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

बालदमा लक्षणे 

दम्याचे प्रमुख लक्षण म्हणजे दम किंवा धाप लागणे हे असते. अनेकवेळा मुलास लागलेली धाप ही खेळल्यामुळे लागली असेल असे पालकांना वाटते त्यामुळे लहान मुलांमधील दमा सहजतेने लक्षात येत नाही. अनेक मुलांना थोडेसे खेळल्यावर कोरडा खोकला येतो. आलेल्या खोकल्याची उबळही भरपूर वेळ असते आणि खोकल्यानंतर श्वास घेताना शिट्टीसारखा आवाजही येऊ शकतो.

काही मुलांमध्ये सतत सर्दी होते, नाक चोंदले जाते, दम लागतो, श्वास घेताना त्रास होणे ही लक्षणे असतात. तर काही मुलांना वारंवार दम लागतो, छातीत घरघर होते, खोकला होतो, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घेताना आवाज येतो, बोलण्यास त्रास होणे अशी लक्षणे बालदम्यात मुलांमध्ये दिसू शकतात. प्रत्येक मुलाच्या बाबतीत बालदम्याची लक्षणे वेगवेगळी असू शकतात.

बालदम्याचा त्रास कधी जास्त होऊ शकतो?

अनेकदा बालदमा असणाऱ्या मुलास धुळ, धुर, परागकण, केसाळ पाळीव प्राणी, दमट व थंड हवामान, प्रखर सुर्यकिरण, कचरा, थंडगार पदार्थ, सिगारेटचा धूर, वायू प्रदूषण, हवेतील प्रदूषित कण यांचा संपर्क झाल्यामुळे मुलाची घुटमळ होऊ शकते. हा त्रास काही मिनिटांपासून ते काही तासापर्यंत राहू शकतो. यामुळे लहान बाळांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन बाळ निळे पडू शकते, नाडीचे ठोके बदलतात.

बालदम्याची कारणे

शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे बालदमा होण्याचे प्रमुख कारण असते. लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेचे विविध आजारामुळे, वाढलेले हवेचे प्रदूषण, धुळ, धूर आणि ऍलर्जीमुळे बालदमा होऊ शकतो.

अनुवांशिकता हे बालदम्याचे एक कारण असू शकते. मात्र दम्याची अनुवांशिकता असलेल्या प्रत्येक लहान मुलाला बालदमा होईलच असे नाही. त्याचप्रमाणे घरात कुणालाही दमा नसला तरीही बाळाला दमा होऊ शकतो.

अन्य सहाय्यक कारणे – बालदमा ट्रिगर :

खालिल कारणे ही बालदमा असणाऱ्या मुलांमध्ये अस्थमा अटॅक निर्माण होण्यास सहाय्यक ठरतात.

ढगाळ वातावरण, हिवाळा व पावसाळा ह्या सारख्या आद्र वातावरणामुळे बालदम्याचा अटॅक येतो,

‎धुळ, धुर, धुके, माती, कचरा, बारीक तंतू, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस, पेंट्स, उग्र वास असणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात आल्यामुळे बालदम्याचा अटॅक येतो,

सिगरेट किंवा इतर प्रकारचा धूरामुळे,

‎शारीरीक अतिश्रमामुळे, भरपूर खेळल्यामुळे, अतिव्यायामामुळे,

वायु प्रदुषणामुळे,

ताप, सर्दी, फ्लू, घसा सुजणे, ब्राँकायटिस, खोकला यासारखे आजार उत्पन्न झाल्याने बालदम्याचा अटॅक येण्याचा धोका अधिक असतो.

बालदम्याचे निदान

मुलाला होणारे त्रास, असलेली लक्षणे व शारीरीक तपासणीद्वारे मुलांमधील अस्थमाचे निदान डॉक्टर करतात. याशिवाय खालील टेस्टही यासाठी केल्या जातील.

तसेच मुलाच्या फुफ्फुसांच्या कार्याची तपासणी करण्यासाठी स्पायरोमेट्री नावाची चाचणी करतील. बालदमा ओळखण्यासाठी स्पायरोमेट्री ही चाचणी करतात. त्यात डॅाक्टर मोठा श्वास घ्यायला लावून ठराविक सेकंदामध्ये तो सोडायला लावतात.

याशिवाय स्टेथिस्कोपद्वारे तपासणी करून श्वासोच्छश्वासावेळी सीटी वाजवल्यासारखा आवाज येतो की नाही ते पाहतील. काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, छातीचा एक्स-रे, ऍलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणीही केली जाते.परंतु आता नवीन एफ ओ टी किंवा आय ओ एस ऊच्च तंत्रज्ञान ऊपलब्ध झाल्यामुळे दमा व बाल दमा निदान व ऊपचार सोपे झाले आहेत.

मुलास दम्याचा अटॅक आल्यास काय उपाय करावे?

आपण धीर धरा आणि मुलासही धीर द्या. दम्याचा अटॅक आलेल्या मुलास सरळ ताठ बसवावे त्याला झोपू देऊ नका. मुलाचे घट्ट कपडे थोडे सैल करा. डॉक्टरांनी दिलेले रिलिव्हर औषध इनहेलर्सने योग्य प्रमाणात त्वरित द्या. पाच मिनिटे वाट पहा. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे रिलिव्हर औषधाची थोडी मात्रा आणखी द्या. मुलाला तरीही बरे न वाटल्यास डॉक्टरांकडे तात्काळ घेऊन जावे.

बालदम्याचा त्रास होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी :

मुलांना अस्थमाचा अटॅक येऊ नये यासाठी करावयाचे उपाय पुढीलप्रमाणे आहेत.

योग्य आहार, विहार आणि औषधोपचाराद्वारे बालदम्याच्या अटॅकपासून दूर राहता येते,

ज्या गोष्टीमुळे आपल्या मुलास दमाचा त्रास जाणवतो (ट्रिगर्स) त्यापासून दूर राहिल्यास दम्याचा त्रास होणार नाही. यासाठी आपल्या मुलास धुळ, धूर, प्रदुषण, घरातील पाळीव प्राणी यांपासून दूर ठेवावे.

पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

‎प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे.

‎थंड पदार्थ खाऊ नये, थंड पाणी घेऊ नये.

‎मुलास मोकळ्या हवेत खेळण्यास घेऊन जावे.

विटामिन A आणि D युक्त आहार द्यावा. बदाम, हिरव्या पालेभाज्या आहारात असाव्यात.

महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स योग्य पद्धतीने व नित्यनमाने वापरावे. अस्थमा इन्हेलर वापरल्याने कोणतेही अपाय होत नाहीत.

आपले मुल डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे नियमितपणे घेत आहे याची खात्री करा.

नियमित तपासणीसाठी मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जावे.

बालदम्यावरील उपचार 

इनहेलरच्या योग्य प्रकारे वापराने अस्थम्यावर नियंत्रण मिळवणे शक्य होते. रिलिव्हर्स आणि प्रीव्हेण्टर्स अशी दोन्ही प्रकारची औषधे इनहेलरमार्फत देता येतात. डॉक्टरांनी दिलेले इनहेलर्स वापरावे. अस्थम्यामध्ये उपचाराकरिता इनहेलरवाटे औषधे घेणे पूर्णपणे सुरक्षित आहे.

जगभरात दम्यावर नियंत्रणासाठी सर्वमान्य पद्धती ही “इन्हेलर” प्रणालीच आहे. याचे कारण म्हणजे गोळ्या व सिरपपेक्षा इन्हेलर जास्त परिणामकारी व निर्धोक आहे. इनहेलरवाटे दिली जाणारी औषधे ही श्वासावाटे थेट फुफ्फुसामध्ये जातात ती रक्तामध्ये मिसळत नाहीत. त्यामुळे शरीरावर त्या औषधांचा दुष्पपरिणाम होत नाही.

डॅा.रमेश भराटे, श्वसनविकार व छातीविकार तज्ञ, लातुर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!