» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : लातूर शहरासह जिल्ह्यात शनिवार दि. 20 रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास दीड दोन तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. जिल्हयातील काहीं भागात तर गारपीठ झाल्याचेही वृत्त आहे. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन चोहोबाजूंनी ढग भरून आले व अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पावसासोबतच वाऱ्याचा जोर जास्त असल्याने शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या यासोबतच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या लातूरकरांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने लातूर जिल्ह्यात दोन दिवसांचा यलो अलर्ट जारी केला असल्याने जिल्ह्यावरील अवकाळीचे संकट कायम आहे. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी हसोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला आहे. या वादळी वाऱ्याने गाऱ्याच्या पावसामुळे आंबा, ज्वारी यासारख्या पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. या अगोदर दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात औसा तालुक्यातील काही गावांना वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला होता. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं होते. त्यानंतर आता जिल्ह्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्ह्यातील ज्वारी, आंबा, द्राक्ष, केळी उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी आता नुकसानीच्या भीतीने धास्तावले आहेत.