» मुखपत्र दक्षता वृत्तांत
अहमदपूर / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली असली तरी सुनेगाव सांगवी गावाने मतदानावर बहिष्कार घातला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झाली नाही. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ होत आहे. अधिकारी वर्ग नाराज ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन देऊन त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव सांगवी गावातील गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत मतदानावर बहिष्कार घातला आहे. याची माहिती मिळाल्यानंतर निवडणूक अधिकारी आणि पोलीस गावात आले. त्यांनी लोकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. गावात रहदारीसाठी बस थांबा, जोडरस्ता, सर्व्हिस रोड नसल्यामुळे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला.