»मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात ११ मतदारसंघात मतदान १३ मे ला होणार आहे. यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा काल शनिवारी (११ मे) रोजी थंडावल्या. रावसाहेब पाटील दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, डॉ.अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज मैदानात आहेत. आज रविवारी फक्त पदयात्रा व प्रत्यक्ष संपर्कावर उमेदवारांचा भर राहणार आहे. राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पुढील २-३ दिवस राज्यातील विविध भागात वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीचा इशारा हवामान विभागाने दिला. यापूर्वीच्या तीन टप्प्यात उष्णतेमुळे मतदान कमी झाल्याचे चित्र होते तर चौथ्या टप्प्यात पावसाचे सावट निर्माण झाले आहे. जर पाऊस उद्या मतदानादिवशी राहिला, तर त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत.