लातूर : मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरूवात; हजारोंच्या संख्येने जनसमुदाय रॅलीत सहभागी ; जागोजागी पाणी नाश्ता, वैद्यकीय सेवेची सोय

1 Min Read

» मुखपत्र दक्षता वृत्तांत

लातूर / साईनाथ घोणे : मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीची सुरूवात झाली आहे. शहरातील सर्वच रस्ते जाम झाले असून हजारोंचा जनसमुदाय रॅलीत सहभागी झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लातूर शहरात मंगळवार ९ जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीला सुरूवात झाली आहे. आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने महिला, पुरूष, युवक, युवती मिळेल त्या वाहनाने लातूर शहरात दाखल झाले होते. संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड येथून लातूरकडे येत असतांना ठिक-ठिकाणी करण्यात येणार्‍या स्वागत सत्कारामुळे शहरात पोहोचण्यास उशिर झाले ते दुपारी सव्वा एक वाजता गरुड चौक येथे पोहोचले आहेत. यावेळी १२ जेसीबीतून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांनी नांदेड रोड मार्गे शहरात प्रवेश केल्यानंतर स्वामी विवेकानंद, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करतील व गंजगोलाई येथील आई जगदंबा मंदिरात आरती करून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे रवाना होणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज बांधवांना संबोधित करणार आहेत. रॅलीमध्ये ठिक-ठिकाणी स्वयंसेवक वाहतुक सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!