लातूर : लोकसभा निवडणूकीनंतर भाजपला गळती लागली असून डॉ. अनिल कांबळे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत परभणीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षातील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खदखद बाहेर येत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील भाजपचं मोठं नाव असलेले सुधाकर भालेराव यांनी भाजपला (BJP) सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपात काहीही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे. भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेतले. त्यामुळे, लातूर भाजपमधील काही नेते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा असते. आता, भाजपमधील नाराजी उघडपणे समोर येत आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या महिनाभरात होत असलेल्या भाजपातील दुसऱ्या नेत्यांच्या राजानाम्यामुळे भाजपला लातूर जिल्ह्यात धक्का बसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
राजकीय विरोधक आले महायुतीमध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांच्या महायुतीत प्रवेशानंतर त्यांचे राजकीय विरोधक असणारे भाजपाचे डॉ.अनिल कांबळे नाराज असल्याचे सांगितले जात होते. दुसरीकडे भाजपमधून उमेदवारीची अपेक्षा असताना डॉ.अनिल कांबळे यांना संधी न देत अडगळीत ठेवले जाऊ शकते, या भावनेतून त्यांनी आज २६ जुलै रोजी भाजपला सोडचिठ्ठी देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.