मुखपत्र दक्षता वृतांत
लातूर : विलासराव देशमुख फाउंडेशनतर्फे हणमंतवाडी येथील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. ट्वेंटीवन ॲग्रीच्या संचालिका सौ. अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. कमी शिक्षण असणाऱ्या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही, त्यामुळे उदरनिर्वाह चालवणे कठीण होते. अशा वेळी त्यांच्यात विविध कौशल्ये निर्माण घरबसल्या रोजगार मिळवून देण्यासाठी हा उपक्रम फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने अनेक महिलांना आर्थिक स्वावलंबन साधणे उपलब्ध होत नाहीत. या पार्श्वभूमीवर विलासराव देशमुख फाउंडेशन महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. या प्रशिक्षण केंद्रातून महिलांना शिलाईचे विविध प्रकार शिकवले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या स्वतःचे उद्योग सुरू करू शकतील. या प्रशिक्षण केंद्रात एकूण 63 महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हे प्रशिक्षण पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत चालणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि आपल्या कुटुंबाचे उत्पन्न वाढवू शकतील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, प्रशिक्षक क्रांती उफाडे, संस्थेचे सोशल प्लॅनर गजानन बोयणे, गावातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.