मुंबई : राज्य शासनाच्या बालसंगोपन योजने अंतर्गत विधवा मातेच्या तीन मुलांना लाभ देण्यात यावा, अशी मागणी सक्षम महिला, सदृढ बालक जनआंदोलनाचे मुख्य प्रवर्तक ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांनी राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री ना. आदिती तटकरे यांच्याकडे एका निवेदना द्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, महाराष्ट्र राज्यात बाल संगोपन योजनेअंतर्गत फक्त दोन अपत्यांनाच प्रतिमहा २२५०/रुपये प्रमाणे लाभ दिला जातो आहे. राजस्थान राज्यात पालनहार योजनेतर्गत प्रतिमहा आर्थिक मदतीसह वर्षाला २०००/- रुपये कपडे, बुट, स्वेटर आदी वस्तूसाठी दिले जाते ज्यात विधवा मातेच्या जास्तीत जास्त तीन मुलांना आर्थिक मदत केली जाते त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यात राज्यातील विधवा मातेच्या १८ वर्षा खालील किमान तीन मुलांना आर्थिक लाभ देणे गरजेचे व आवश्यक आहे. उदा:- मौजे वलांडी ता देवणी. जि. लातूर येथील पीडित कुटुंबियांच्या फिर्यादीवरून कलम ३७६, अ, ब,२, एन ३७७,ॲट्रोसिटी, पोक्सो ४,६ अंतर्गत गुन्हा क्रमांक २८/२०२४ दाखल करण्यात आलेला आहे. पीडित कुटुंबियांत वयोवृध्द सासु, सासरे, एक विधवा महिला व चार अल्पवयीन मुली, एक लहान मुलगा असा परिवार आहे. जी मोलमंजुरी करून उपजीविका भगवितात त्यामुळे अशा गरजवंत विधवा मातेच्या मुलींची संख्या पाहता, किमान तीन अपत्यांना बालसंगोपन अंतर्गत आर्थिक मदत देण्याची तरतूद राजस्थान पालनहार योजने प्रमाणे बाल संगोपन योजनेत केल्यास गरजूंना फार मोठी मदत मिळणार आहे. तरी, आपणास विनंती करण्यात येते की, अश्या पीडित कुटुंबीयांच्या अपत्यांना लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेत संबंधिताना उचित आदेश देवुन सहकार्य करावे अश्या आशयाचे निवेदन यावेळी सक्षम महिला, सदृढ बालक जनआंदोलनाचे मुख्य प्रवर्तक ॲड. प्रदीपसिंह गंगणे यांनी दिले.