मुखपत्र दक्षता वृतांत
लातूर : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून वडिलांनी मुलाची हत्या केली. ही घटना गुरुवार (दि.२९) रोजी घडली. कृष्णा शिवाजी संगनगीरे (वय २७) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी शिवाजी विश्वनाथ संगनगीरे (वय ५४) याच्याविरुद्ध हत्येच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत सविस्तर वृत असे की, गुरुवारी (दि. २९) रोजी सकाळी कृष्णा हा देवदर्शनासाठी गावाला निघालेल्या वडिलांसोबत बोलत असताना क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद उफाळून आला. अशातच कृष्णाच्या वडिलांनी त्याला काठीने मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला, कृष्णाचा भाऊ डॉक्टर ला आणण्यासाठी गेला तर आई दरवाज्यात उभी होती. यावेळी त्याच्या वडिलांनी हा बेशुद्ध अवस्थेतून उठला तर आपल्याला जिवंत सोडणार नाही या भीतीतून त्याचा गळा आवळला आणि कृष्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची गोपनीय माहिती मिळताच किनगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांना संशय वाटला. घटनेचे गांभीर्य ओळखत उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष कल्याणकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन प्रकरणाची उकल करण्याच्या अनुषंगाने पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या अभिप्रायावरून किनगाव पोलिसांनी तपासाची चक्री फिरवीत संशयित आरोपी शिवाजी विश्वनाथ संगनगीरे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घटनाक्रम सांगून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार सपोनि भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तोटेवाड हे करत आहेत.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता क्षुल्लक कारणावरून वडिलांनी मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.