लातूर / साईनाथ घोणे : लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणून लातूर – मुरुड – टेंभुर्णी रस्त्याकडे पाहिले जाते. मराठवाड्यातील या महत्वपूर्ण मार्गाचा मागील २० वर्षांपासून ज्वलंत प्रश्न सुटला नाही. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांनी दिली.
पुढे बोलताना शेटे म्हणाले, आत्तापर्यंत १२२ जण या रस्त्यावर मृत्यूमुखी पडले आहेत. १२२ कुटुंब उध्वस्त झाले आहेत. या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे वाहनाची, जीवनाची, इंधनाची हानी होत आहे, या अडचणीतून नागरिकांची मुक्तता करण्यासाठी रविवार (दि.२२) रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटापासून दिक्षाभूमी येथे अभिवादन करून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, कृषी उत्त्पन्न बाजार समिती चाकूरचे सभापती निळकंठ मिरकले, लक्ष्मीकांत तवले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
टोल नाके बंद पडू नयेत म्हणून मंजुरी मिळत नाही
लातूर – सोलापूर- टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाके सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांचे असून ते बंद पडू नये म्हणून कदाचित लातूर-मुरुड-टेंभुर्णी मार्गावरील मुरुड अकोला-येडशी डांबरीकरण व चौपदरीकरनाला मंजुरी मिळत नाही, असा आरोप देखील संजय शेटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.