■ मुखपत्र दक्षता वृतांत
लातूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून दुचाकी पळविणारी टोळी उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केली असून, त्यांच्याकडून ४ दुचाकी असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, चार जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीप्रकरणी तक्रार दाखल केली होती. शिवाय, अन्य पोलिस ठाण्यांच्या हद्दीतूनही दुचाकी पळविल्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यातील आरोपींच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी वपोनि राजकुमार पुजारी यांच्या नेतृत्वातील पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला. पथकाला दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती खबऱ्याने दिली. या माहितीच्या आधारे दुचाकी चोरणाऱ्या आरोपींची टोळीतील सदस्यांना त्यांच्या ठिकाणाहून उचलण्यात आले. शिवाजी बाबुराव लिंबाळे वय २२ वर्ष, रा.बनशेळकीरोड उदगीर, विकम विठल कांबळे उर्फ नेत्या वय १८ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. संतकबीरनगर उदगीर, निलेश नंदु सकट वय १९ वर्ष, व्यवसाय मजुरी रा. संतकबीरनगर बनशेळकीरोड उदगीर अशी त्यांची नावे आहेत. अधिक चौकशी केली असता त्यांनी हे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस अंमलदार सुनिल भिसे, राम बनसोडे, घोरपडे, संतोष नाना शिंदे, नामदेव चोवले, राजकुमार देवडे यांनी कामगिरी पार पाडली.