| मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर :आजच्या धावपळीच्या युगात माणुस हा आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. तो पुर्णतः संसारात, कुटूंबात, व्यवसायात व्यस्त झालेले चित्र पहावयास मिळत आहे परंतू असे जरी असले तरी या व्यापातूनही प्रत्येक व्यक्तीने म्हणजेच ती महिला असू या पुरूष प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी किमान १ तास व्यायाम करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी तंदुरूस्त रहायला हवे असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
आज आपण पहात आहोत की प्रत्येकाच्या पाठीमागे घाई-गडबड सुरू आहे. जो तो आपल्या कामात पुर्णतः व्यस्त होवून गेला आहे. काम तर सर्वांनाच करावे लागणार आहे पण ते करत असताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आज आपण पहातो की मोठ-मोठे उद्योगपती, नेते मंडळी तसेच कलाकार, डॉक्टर, इंजिनिअर हेही आपल्या व्यस्त शेड्युलमधूनही व्यायामासाठी वेळ काढतात व आपल्या आरोग्याविषयी जागरूक असलेले चित्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून पहायला मिळत आहे वा ऐकावयास येते. पण सर्वसामान्य माणूस हा मला वेळ नाही, माझ्यापाठीमागे काम आहे. मला कुटूंब आहे, मला संसार आहे, मला लवकर उठणे होत नाही. मी रोज फार अवघड काम करतो, असे ना-ना प्रकारचे कारणे सांगून व्यायाम न करण्यासाठी कारणे देत असतो. पण असे न करता प्रत्येकाने व्यायाम करणे ही काळाची गरज आहे व निरोगी आयुष्य जगायचे असेल तर व्यायामाशिवाय पर्याय नाही हे ही तिकेच खरे आहे.
सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे हे गेल्या अनेक वर्षापासून व्यायामाच्या माध्यमातून जनजागृती करत असुन त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या आपल्या मित्र परिवारांना भेटून व्यायामाबद्दलची जनजागृती करताना दिसतात. व्यायाम कराल तर तुम्ही पुढील आयुष्य छान प्रकारे जगु शकाल अन्यथा तुम्हाला आजार जडतील आणि मग तुम्हाला व्याधीग्रस्त व्हावे लागेल यासाठी सर्वांनी दिवसातून एक तास चालून आपल्या अंगातून घाम निघेल अशा प्रकारचा व्यायाम करावे असा संदेश संजय राजुळे आपल्या मित्र परिवारांना तसेच अप्तेष्टांना नेहमी करतांना दिसतात. खरोखरच आपल्या घरातील सदस्य असल्यासारखे ते एक आपुलकीचा संदेश देतात. संजय राजुळे यांच्यासारखे व्यक्ती जर एवढ्या पोटतिडकीने सांगत असतील तर त्यांचे अनुकरण करणे ही एक चांगला नागरीक म्हणून आपली जबाबदारी आहे.