» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / प्रतिनिधी : शहरातील अंबाजोगाई रोड परिसरातील बस स्टॅन्ड समोरील रस्त्यावरील वाहत असलेली दोन्ही बाजूची नाली, रहिवाशांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. शनिवारी (दि.२०) रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. प्रत्येक वेळी पाऊस पडल्यानंतर येथील नाल्यातील कचरा बाहेर येतो आणि दुर्गंधी वाढते. याठिकाणची महानगर पालिकेची दैनंदिन साफसफाई मंदावली असल्याने कचऱ्याने नाल्या तुंबल्या आहेत. यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक त्रस्त झाले असून, शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातील लहान-मोठे क्लिनिक हाउसफुल झाले आहेत. हा रस्ता शहरातील महत्वाच्या रस्त्यापैकी एक आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र पाऊस पडल्यानंतर येथील नाल्यातील कचरा बाहेर येऊन दुर्गंधी वाढते यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या व तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतो. या दुर्गंधीमुळे रोगराई पसरण्याचीही अधिक शक्यता आहे. वर्षभर ही समस्या असली तरी, विशेषतः पाऊस पडल्यावर दुर्गंधी अधिक वाढते. पाऊस पडल्यावर नागरिकांना या रस्त्यावरून इच्छा नसताना जावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे, अशावेळी मनपा प्रशासनाने या रस्त्यावरील तुंबलेल्या नाल्याची दैनंदिन साफसफाई करावी, ही मागणी नागरिकांतुन जोर धरत असून अस्वच्छतेमुळे संताप व्यक्त केला जात आहे मात्र महानगर पालिकेचा निगरगठ्ठ स्वच्छता विभाग मूग गिळून आहे.