» मुखपत्र दक्षता वृत्तांत
अहमदनगर / प्रतिनिधी : रामभक्त हनुमानाने लंकेचे दहन केले. उद्या हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने मतदारांनी विरोधकांच्या लंकेचे दहन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी नौटंकी करून कोणी निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी काम करावे लागते, असा टोला विरोधी उमेदवाराला लगावत डॉ. सुजय विखे यांचा विजय पक्का असल्याचा विश्वासही व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी या देशात सहकाराचे बीज रोवले आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याचा वटवृक्ष केला. आता या परंपरेचा वारसा डॉ. सुजय विखे पाटील पुढे चालवित आहेत. लोकसभेत या मतदारसंघातील किंबहुना राज्यातले प्रश्न देखील ते मांडतात. येथील मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतात, हा इथला इतिहास असून डॉ. सुजय यांच्या नावातच जय आहे. त्यामुळे त्याचा पराजय होऊ शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.