» मुखपत्र दक्षता वृत्तांत
लातूर / साईनाथ घोणे : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने १५ जुलै २०२४पासून प्रवाशाच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण करण्यासाठी प्रत्येक आगारात दर सोमवारी व शुक्रवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. याची माहिती एस टी महामंडळाचे विभाग नियंत्रक अश्वजीत जानराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमामध्ये विभाग नियंत्रक आगारात जाऊन प्रवाशांच्या व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतील. त्यामुळे प्रवाशाचे समाधान होवून प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, अशी माहिती देऊन राज्य परिवहन लातूर विभागातील आगारात विभाग नियंत्रक प्रवासी राजा दिन व कामगार पालक पालक दिनाला १५ जुलैपासून सुरुवात होईल. १५ जुलै २०२४ रोजी अहमदपूर, १९जुलै २०२४ रोजी उदगीर, २२ जुलै २०२४ रोजी निलंगा, २६ जुलै, २०२४ रोजी लातूर येथे, तर २९ जुलै २०२४ रोजी औसा येथे प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित केला जाणार आहे. या वेळापत्रकानुसार राज्य परिवहन आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्रवासी राजा दिन आयोजित केला जाईल. यावेळी प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या, तक्रारी, सूचना लेखी स्वरुपात मांडू शकतात. प्रवासी राजा दिन झाल्यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार असून या वेळेत संघटना व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न (रजा मंजुरी, कर्तव्यासंबंधी, वेळापत्रकासंबंधी व प्रमादिय कारवाई) तक्रारी लेखी स्वरुपात घेवून तक्रारींचे तात्काळ निराकरण करतील. तरी सर्व प्रवासी बंधू-भगिनींनी व राज्य परिवहन कामगार यांनी याचा लाभ घेवून आपल्या समस्याचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी यावेळी केले.