मुंबई : येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) मालकीच्या शतकापूर्वी बांधलेल्या ६८ मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये बहुतांश इमारतींना दुरुस्ती आणि पुनर्विकासाची नितांत गरज आहे. माहीम आणि कुलाबा दरम्यान असलेल्या ६८ उपकरप्राप्त इमारतींमध्ये २५०० कुटुंबे राहतात. या इमारतीतून त्यांना बेदखल करण्यात येत असल्याचा आरोप करत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या एलटीओडब्लूए असोसिएशनने कांही दिवसापूर्वी मुंबई येथील आझाद मैदानात लक्षवेधी आंदोलन केले होते.
त्यानंतर आता याप्रकरणाकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर सोमवार (दि.१९) रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या सुमारास एलटीओडब्लूए असोसिएशनच्या वतीने मुंबईच्या क्रांती मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ३०० फूट लांबीची राखी प्रदर्शीत केली जाणार आहे. ही राखी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडे १०० पेक्षा अधिक महिला रहिवाशी उपस्थित राहून सुपूर्द करून या महिला रहिवाशी पंतप्रधानांना त्यांची घरे एलआयसीकडून वाचवण्याची विनंती करणार असल्याची माहिती एलटीओडब्लूए असोसिएशनचे सचिव मुकेश शाह यांनी दिली आहे.