मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहिल – आंदोलक
Contents
मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहिल – आंदोलकमुखपत्र दक्षता वृतांतलातूर/ प्रतिनिधी : धनगर समाजाला घटनेत अनुसूचित जमातीत आरक्षण दिलेले आहे. याची अंमलबजावणी करावी यासाठी मल्हार योद्धे चंद्रकांत हजारे व अनिल गोयेकर यांनी सोमवार (दि.९) पासून येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात आमरण उपोषण केले. याची शासनाने दखल घेऊन आज उपोषणाच्या ७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून आंदोलकांशी संपर्क साधला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे यांच्याशी बोलताना सरकार धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक असून आताच समाजाच्या मागण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगितले. ही चर्चा सकारात्मक झाली असून, उपोषण स्थगित करा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले परंतु आंदोलकांना या संवादादरम्यान बोलण्याची संधीच मिळाली नाही. मुख्यमंत्र्यानी केलेल्या आवाहनावर बोलताना आंदोलक मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी ‘धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावे’ अंमलबजावणी होईपर्यंत उपोषण आंदोलन सुरु राहणार, यावर ठाम असल्याचे सांगितले. जोपर्यंत समाजाच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत उपचार घेणार नाही, असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. धनगर समाज राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत क्रमांक दोनचा आहे. असे असतानाही केवळ राजकीय हेतूसाठी प्रत्येक सरकारने धनगर समाजाची दिशाभूल व फसवणूकच केली आहे. असा आरोप देखील मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी यावेळी केला.